वारंवार सर्दी होण्याचे कारण काय?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 16:53

वारंवार सर्दी होतेय? जाणून घ्या कारणे अन् उपाय

पावसाळ्यात सर्दी-खोकल्याचे प्रमाण बरेच वाढलेले असते. शिंका, नाक गळणे, घसा खवखवणे अशा तक्रारी अनेकांना सुरूच असतात. सर्दी-खोकल्याच्या जंतूचा वास अनेक ठिकाणी असतो. अगदी घशातली छोटीशी खवखवही भविष्यातल्या सर्दीचे लक्षण असू शकते. सर्वसाधारण सर्दी सात ते दहा दिवसांत बरी होते. परंतु, काही वेळा ही सर्दी यापेक्षा अधिक काळ राहते. आपल्या काही चुका याला कारणीभूत ठरतात.

सर्दीचा त्रास वर्षभर असणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वातावरणातले बदल तर याला कारणीभूत तर आहेतच पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि अयोग्य दिनचर्याही तितकीच कारणीभूत आहेत. अधूनमधून होणाऱ्या सर्दीला वैद्यकीय शास्त्रात कॉमन कोल्ड असे म्हटले जाते. सर्दी ही संसर्गजन्य असते. ती नेमकी कशाने होते हे शंभर टक्के नेमकेपणाने सांगता येत नाही. त्यामुळे सर्दी वारंवार उद्भवत असेल किंवा जात नसेल तर या बाबींकडे लक्ष द्या...

शांत झोप आवश्यक
रात्रीच्या शांत आणि पुरेशा झोपेचे महत्त्व अजूनही नागरिकांना कळलेले नाही. सर्वांगीण आरोग्याच्या दृष्टीने रात्रीची झोप अतिशय महत्त्वाची आहे. धावपळ, धकाधकीचे, जीवन, कामाचा ताण या सगळ्याचा परिणाम झोपेवर होतो. अनेक जण रात्री जागून काम करतात. कामाच्या वेळांमुळे पुरेशी झोप घेता येत नाही. मात्र, सतत होणारी सर्दी अपुऱ्या झोपेचे लक्षण असू शकते. सर्दी बराच काळ टिकून राहिली तर शरीराला विश्रांतीची गरज आहे असे समजा. सर्दी झाल्यावर शरीराला विश्रांतीची गरज असते. त्यामुळे वेळेत झोपा. झोपण्याआधी सर्व गॅझेट्स बाजूला ठेवा. यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल आणि सर्दीचा परिणामही कमी होईल.

फळे, भाज्या यांचे करा सेवन
आजारी पडल्यावर काहीतरी चटपटीत, चमचमीत खाण्याची इच्छा होते. परंतु, या ळात चॉकलेट्स, वेफर्स खाण्यापेक्षा पोषक आहार घ्या. फळे, भाज्या यांचे मोठ्या प्रमाणात सेवन करा. शरीराला पोषक घटक मिळाल्यावर सर्दी दूर करण्यास मदत होते.
प्रतिजैविक घेणे टाळा
सर्दी व खोकल्यावर प्रतिजैविक परिणामकारक ठरत नाहीत. बॅक्टेरिया म्हणजे जिवाणूंमुळे होणाऱ्या आजारांवर प्रतिजैविक प्रभावी ठरतात. सर्वसाधारण सर्दी विषाणूंमुळे होते. त्यामुळे प्रतिजैविकांच्या सेवनामुळे तुम्ही बरे होत नाही. उलट सर्दी वाढत असते. शरीराला गरज नसताना प्रतिजैविक घेणे टाळा. अन्यथा शरीर प्रतिजैविकांचा प्रतिकार करू लागते आणि औषधे लागू पडत नाहीत.

ताणतणाव, धावपळ करू नका
ताणतणाव, धावपळ आदी कारणांमुळेही शरीर सर्दी-खोकल्याच्या विषाणूंचा सामना करू शकत नाही. ताणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि शरीर बरे व्हायला अधिक वेळ घेते. तेव्हा अशा काळात अधिकचा ताणतणाव घेणे टाळा.

दूध व हळद
गरम पाणी किंवा गरम दुधात एक चमचा हळद घालून प्या. यामुळे सर्दी-खोकल्यावर आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते. यामुळे सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत होते.

आल्याचा चहा
आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र, आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजे आले छान बारीक करून घ्यावे आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावे. काही वेळ ते उकळल्याने ते प्या.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info